सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते. अशा कायमस्वरूपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरू आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी, पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू आहे. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे.